१.
काळजाला जाळतो मी
माणसे सांभाळतो मी
दुःख आहे भोवतीला
तेच तर कुरवाळतो मी
वेदना ह्या सोबतीला
वेदनांना पाळतो मी
हर्ष होतो भेटताना
पण तिलाही टाळतो मी
उंबऱ्यातच सुख उभे पण
दुःख ते न्याहाळतो मी
भांडते ती रोज आता
का तिच्यावर भाळतो मी
सोडल्यावर साथ आता
आसवे ना गाळतो मी
२.
मी कधी होतो खास कुणासाठी ?
बाळगावे हे भास कुणासाठी ?
कोण होती ती प्रश्न अता पडला
आजवर जपले श्वास कुणासाठी ?
थांबलो का मी आस कशाची ही ?
घेतला हा मी ध्यास कुणासाठी ?
पाश प्रेमाचे प्राण तिच्या हाती
रेशमी हा बघ फास कुणासाठी ?
कागदावर कोऱ्याच सही केली
एवढा हा विश्वास कुणासाठी ?
मोह सारा हा त्याग जरा आता
काढला तू हा घास कुणासाठी ?
भोगले तूही भोग दिलेले जर
हा नव्याने वनवास कुणासाठी ?
३.
आयुष्याची होळी करणे सोपे नसते
प्रेमासाठी सहजच मरणे सोपे नसते
लग्नाची हो मुलगी झाली घटिका आली
थांबवणे डोळ्यांचे झरणे सोपे नसते
तू जिंकावी यासाठी तर माझे हरणे
यश हाती असताना हरणे सोपे नसते
अर्ध्या वाटेसाठी केवळ सोबत होती
अर्धे जीवन मग सावरणे सोपे नसते
जगलो येथे नातीगोती सांभाळत मी
जाताना माया आवरणे सोपे नसते
अपमानाचे जगणे माझे सोसत असतो
दाराशी हसतच अवतरणे सोपे नसते
जगणे व्हावे दुसऱ्यासाठी मंतरलेले
आयुष्याला ह्या मंतरणे सोपे नसते
...................................................
बाळू श्रीराम,
शिरपूर (धुळे )
9011970073