मराठी गझल : काही गैरसमज

 

प्रिय गझलस्नेही मित्र मैत्रिणींनो,

'गझलकार' सीमोल्लंघन ह्या ऑनलाइन अंकाचे हे सोळावे वर्ष. तुम्हा सर्वांच्या लेखन सहकार्याशिवाय हा भरगच्च विशेषांक अशक्य होता. असेच सोबत रहा. गेल्या चार-पाच वर्षांत प्रत्यक्ष भेटीत, फोन कॉल्सवर, व्हाटस् अपवर अनेक संशोधक, अभ्यासक,  ज्येष्ठ-नवोदित गझलकार यांनी मराठी गझलच्या संदर्भात मला अनेक शंका विचारल्या. त्या अनुषंगाने संपादकीय लिहावं असं मनात आलं. नेहमीच्या संपादकीयापेक्षा हे वेगळं संपादकीय तुम्हाला उपयुक्त वाटावं; कारण या संपादकीयात तुमच्या मनातल्या शंकाचे निरसन करणाऱ्या मजकुराचा समावेश आहे.

गझल हा मूलतः अरबी आणि फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेला साहित्यप्रकार असून त्याची मराठीतली प्रवासगाथा अत्यंत समृद्ध आहे. गझलचे तंत्र, वैचारिक अभिव्यक्ती आणि प्रभावी सादरीकरण शैली यामुळे अनेकांना ती आवडते. त्यामुळेच आजघडीला मराठी काव्यक्षेत्रात  अल्पावधीतच गझलने स्वतःचे अढळ असे स्थान निर्माण केल्याचे आपल्याला दिसते आहे. गझलेला मराठी साहित्यात रुजवण्यासाठी, विकासासाठी अनेकांनी जीवाचे रान केले आहे. तेव्हा कुठे आज या काव्यप्रकाराला एक सशक्त, व्यापक आणि वैविध्यपूर्ण प्रकार म्हणून रसिक स्वीकारताना दिसताहेत. परंतु सोबतच गझलेच्या तंत्राविषयी, आशय अभिव्यक्तीविषयी अनेक गैरसमज कळत न कळत रुजताना दिसत आहेत. फोफावताना दिसताहेत. त्यांना खतपाणी घालणारे तथाकथित मार्गदर्शक आणि त्यांचे अनुसरण करणारे  तीच री ओढताना दिसत आहेत. कोणताही साहित्यप्रकार, कोणत्याही भाषेत जसा आहे तसा रुजतो. आधी भाषा स्वीकारतो. शैली, लालित्य, मांडणी आणि सादरीकरणाच्या माध्यमातून भाषेचे संस्कार अंगिकारतो. हे सर्व होत असताना साहित्यिकही आपले कसब पणाला लावून त्या साहित्यकृतीला अधिकाधिक सुंदर कसे करता येईल याचाच विचार करीत असतो. पण जसजसा काळ पुढे सरकत जातो, तशी भाषाही बदलत जाते. जुने शब्द संदर्भ होतात तर नवीन शब्द त्यांची जागा साहित्यात निर्माण करतात. अनेक ठिकाणी काव्यातील क्लिष्ट नियमांना सोपे करण्यासाठी साहित्यिक जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. तो अपवाद यशस्वी झाला, रसिकांकडून स्वीकारला गेला तर कालांतराने तोच नियम म्हणून स्वीकारल्या जातो. हेही आपण पाहिलं आहेच. त्या अनुषंगाने समज-गैरसमजांचा हा प्रवास प्रत्येक साहित्यप्रकारात असतोच, तसाच मराठी गझलेमध्येही आहे. ज्यामुळे नवोदितांना गझल लिहिताना संभ्रमावस्थेतून जावे लागते. नेमके काय स्वीकारावे हे कळत नाही. जे नेमके गझलेच्या सृजनशीलतेवरच मर्यादा घालते.

आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, गझलचा उगम अरबी भाषेत झाला. पुढे फारसी -उर्दू -हिन्दी असा प्रवास करीत ती मराठीत आली. प्रारंभी अरबी भाषेत लिहिल्या गेलेल्या गझलात रदीफ नसायचा अशी नोंद आहे. गझलचे विषय ईशस्तुतीपासून प्रेयसीच्या सौंदर्यशाली विभ्रमापर्यंत, समाजवादापर्यंत बदलत आलेत. असे असले तरी तिच्या सृजनशीलतेचे आणि अभिव्यक्तीचे कोणतेही बंधन ही परंपरा मराठीवर लादत नाही. म्हणूनच मराठी गझलेची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात सुरेश भट यशस्वी ठरलेत. उर्दू गझलची तांत्रिकता स्वीकारून, मराठीचे भाषिक सौंदर्य अधिक खुलवत मराठी गझलने आज आपली स्वतंत्र शैली विकसित केली आहे.

गझल लिहिण्यासाठी नियमांची गरज असते हे सर्वविदित आहेच. त्याचे काही तांत्रिक नियम आहेत, हे खरे आहे. पण फक्त तंत्र अवगत झाले म्हणजे गझल लिहिता आली असे म्हणणे चुकीचे ठरेल.गझलचे तंत्र जरी शिकले तरी तिच्यामधून अभिव्यक्त होणाऱ्या भावना महत्त्वाच्या असतात. गझल लिहिताना भावना, अनुभव आणि काव्यात्मकता यांचा योग्य समन्वय साधणे आवश्यक असते. केवळ तंत्राच्या आधारे उत्तम गझल लिहिल्या जात नाही आणि ती समृद्धही होत नाही. त्यासाठी सर्जनशील मनाची अधिक गरज असते. 

चौतीस गझलांचा समावेश असलेला सुरेश भटांचा 'रंग माझा वेगळा ' हा संग्रह १९७४ साली प्रसिद्ध झाला. त्याला आज पन्नास वर्षे पूर्ण झालीत. गझलेच्या बाराखडीत 'स्वर काफिया ' बद्दल काहीच उल्लेख नसताना अलीकडच्या पंधरा-वीस वर्षात स्वर काफियाच्या अनेक गझला मराठीत लिहिल्या गेल्या. याचा अर्थ स्वर काफिया आपण उर्दू-हिन्दी गझलांच्या अवलोकनातून- अभ्यासातून मराठीत अंगिकारला. म्हणजे स्वीकारशीलतेने मराठी गझल विकसित होत आहे.ह्या पार्श्वभूमीवर हल्ली गझलसंबंधी असलेल्या काही गैरसमजांचा विचार करूया.


गैरसमज १: गझल अक्षरगण वृत्तात लिहावी. मात्रा वृत्तात लिहू नये.


अनेक जणांचा असा गैरसमज आहे की गझल फक्त अक्षरगण वृत्तातच लिहावी. किंबहुना अनेक मार्गदर्शक अट्टाहासाने सांगतात. मात्र, हे पूर्णपणे सत्य नाही. अक्षरगण वृत्तात नैसर्गिक पद्धतीने लय सांभाळल्या जातेच, त्यामुळे सादरीकरणात कोणताही अडथळा येत नाही. म्हणून अक्षरगण वृत्तात लिहिलेल्या गझलेचा प्रभाव अधिक असू शकतो. पण त्यामुळे गझल त्याच वृत्तात लिहावी हा अट्टाहास योग्य नव्हे. गझल सम्राट सुरेश भटही गझलेच्या बाराखडीत ‘शक्यतो अक्षरगण वृत्तात‘ असाच उल्लेख करतात. याचाच अर्थ गझल वृत्ताच्या कोणत्याही प्रकारात लिहिल्या जाऊ शकते. म्हणूनच गझलकार गझलेच्या लयबद्धतेचा आणि आशयाचा विचार करून आपल्या शैलीनुसार वृत्त निवडण्याचे स्वातंत्र्य घेतो. ते त्याला घेऊ द्यावे. अभ्यासाअंती असे निदर्शनास आले की मात्रावृत्त हे गझलेचे स्वरूप अधिक लवचिक बनवते आणि त्यामुळे आशयाची विविधता सहज स्वरूपात मांडता येते. गझलेतील आशयाची, विषयांची व्याप्ती वाढवता येते. अनेक गझलकार मात्रावृत्तातूनही लय हरवू न देता ताकदीने खयालाची मांडणी करत असतात. त्यामुळे फक्त अक्षरगण वृत्तातच उत्तम गझल निर्मिती होऊ शकते हा भ्रम डोक्यातून काढून टाकला पाहिजे.

गझलकारांनी गझल लिहिताना अनेक वृत्ते हाताळली पाहिजेत किंवा नवीन वृत्ते घडवली पाहिजेत. असाही आणखी एक गैरसमज अक्षरगण वृत्तांच्या बाबतीत गझलकारांच्या मनात असल्याचे निदर्शनास आले आहे. 

अभ्यासाअंती असे लक्षात आले की सुरेश भटांच्या निम्म्या गझला 'आनंदकंद','मंजुघोषा', 'व्योमगंगा', 'देवप्रिया', 'वियद्गंगा' आणि 'राधा' अशा केवळ सहा वृत्तात आहेत. तर ग़ालिब यांच्या निम्म्या गझला 'वैशाख', 'देवप्रिया' आणि 'वियद्गंगा' अशा केवळ तीनच वृत्तात आहेत. 'देवप्रिया' आणि 'वियद्गंगा' ही दोन वृत्ते, ग़ालिब आणि सुरेश भट यांच्या गझलांत समान आहेत. ह्या दोन वृत्तांसह त्यांच्या निम्मे गझलांत आढळणारी ही वृत्ते शतकानुशतके प्रचलित असलेली वृत्ते आहेत. गझलकाराने किती वृत्ते हाताळली? यापेक्षा त्याने ज्या गझला लिहिल्या त्यात प्रतिमांचे नाविन्य (Originality)  किती? हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण गझलांच्या मौलिकतेचा तोच एकमेव निकष असतो.


गैरसमज २: गझलेची भाषा कठीण असते.


गझलकार सोडले तर बहुतांश वाचकांचा हा गैरसमज आहे की गझलेत जी भाषा वापरली जाते ती कठीण असते आणि ती फक्त विद्वान किंवा तज्ज्ञ लोकांनाच समजते. शेराची सूचकता आकलनाच्या कक्षेत येत नसल्याने असा समज होऊ शकतो. बोली भाषा आणि प्रमाण भाषेच्या वापरात जसजसा कठीण , संस्कृतप्रचुर भाषेचा वापर कमी होतो आहे त्याच गतीने गझलेत वापरले जाणारी भाषाही सोपी होत आहे. आजच्या पिढीतील बहुतांश गझलकार सर्वसामान्यांच्या भाषेत लिहिताहेत. त्यांच्या गझलेचे शेर साधे, सोपे तरीही आशयगर्भ आहेत. गझलकार नव्या कल्पना, नवी विषयवस्तू आणि नवा दृष्टिकोन गझलमध्ये आणत आहेत. त्यामुळे गझल ही एका विशिष्ट चौकटीमध्ये न अडकता ती आधुनिकतेच्या दिशेने प्रवास करत आहे. गझलेतील सौंदर्याचा अनुभव घ्यायला ज्ञानाचे बंधन नसते. तिची भाषा हीच तिची ताकद असते. तिच्या अर्थगर्भतेचा अनुभव घेण्यासाठी भाषेचा अडसर येऊ नये.


गैरसमज ३: गझलमध्ये फक्त मराठी शब्दच वापरावे.


गझलेतील शब्दांचे उपयोजन कसे करावे? मराठी गझल असेल तर सगळे शब्द मराठीच असावे असा आग्रह धरला जातो. गझलेमध्ये उर्दू, हिंदी किंवा इंग्रजी शब्दांचा वापर करणे चुकीचे आहे, असा एक मतप्रवाह आहे. तो चुकीचा आहे. अनेक शतकांच्या प्रवासात कितीतरी अन्य भाषांचे शब्द मराठी भाषेत मिसळून एकजीव झालेले आहेत. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गझल हा एक सर्जनशील साहित्यप्रकार असल्याने त्यात विविध भाषांचे, अर्थपूर्ण आणि मराठीत प्रचलित झालेले शब्द वापरून तिची अभिव्यक्ती अधिक समृद्ध करता येऊ शकते. अगदी सुरेश भटांच्या गझलांतही किती तरी गैरमराठी शब्द आलेले आहेत. तो स्वतंत्र लेख याच अंकात मी लिहिला आहे .भाषा ही नेहमीच तात्कालिक असते. ती सतत उत्क्रांत होत असते. बदल स्वीकारत असते. त्या काळातील लोकांना समजेल अशा भाषेत लिहिलेले साहित्यच संदेशवहनाचे कार्य उत्तम करू शकते. एक गझलकार म्हणून त्याला भावनांच्या अभिव्यक्तीसाठी आपल्या भाषेत रूढ झालेल्या इतर भाषांचे शब्द वापरण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. विशिष्ट शब्दयोजनेचे बंधन घालणे म्हणजे गझलकाराच्या सृजनशीलतेवर मर्यादा घालणे होय.


गैरसमज ४: ग्रामीण किंवा बोलीभाषेतील शब्द वापरू नये.


भाषा ही संवादाचे श्रेष्ठ माध्यम आहे. त्यामुळे भाषा कोणतीही असो, कोणाचीही असो, ती संवाद साधू शकत असेल तर तिला श्रेष्ठ मानायला हवे. नाही तर दोन भाषिक समूह एकमेकाला दूषणे देत आपल्या साहित्यिक दिवाळखोरीचा मार्ग सुकर करतील असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जगातली प्रत्येकच भाषा बोली भाषेतून जन्मून उत्क्रांत होत गेली आहे. आजच्या प्रचलित प्रमाण भाषेत ज्या शब्दांना प्रतिशब्द सापडत नाहीत, अशा अनेक शब्दांसाठी बोली भाषेत शब्द आजही उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वरीत साठ टक्के शब्द वऱ्हाडी बोलीतले आहेत, हे पु.ल. देशपांडे यांचे विधान प्रसिद्ध आणि मौलिक आहे. तसेच ज्ञानेश्वरीत आलेल्या  कन्नड शब्दांचा अभ्यासही स्वतंत्रपणे झाला आहे. हे आपल्या मराठी भाषेचे अभिजातपण आहे. त्यामुळेच गझलेत अमुक शब्द वापरू नये हे म्हणणे चुकीचे आहे. याउलट जर बोलीभाषेतील शब्दांनी गझल अधिक प्रभावी होत असेल, सर्वसामान्यांना उमजत असेल, वाचकांशी सहज संवाद साधत असेल तर ती गझलेला व्यापकत्व देणारी ठरते.


गैरसमज ५: स्वर काफिया वापरू नये.


पारंपरिक गझलेत अलामत किंवा उपांत्य स्वराला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे काफियांची संख्या मर्यादित होते. पर्यायाने गझलेतील शेरांची संख्या मर्यादित होते. ज्यामुळे अनेकविध विषय हाताळण्याचे, मांडण्याचे कसब असूनही गझलकार हतबल ठरतो. याउलट स्वर काफिया म्हणजे काफियाच्या शेवटच्या एकाच स्वरावर आधारित काफिया (जसे: 'आ', 'ई', 'ओ') गझलकाराला अनेकविध विषयाचे दालन उघडे करून देतो. बऱ्याच पारंपरिक पद्धतीने लिखाण करणाऱ्या गझलकारांना स्वर काफिया वापरणे गैर वाटते. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, स्वर काफिया वापरल्याने गझलेचे सौंदर्य, आशयघनता आणि विषय मर्यादा वाढते. त्यामुळे गझल अधिक प्रगल्भ होत जाते.


गैरसमज ६: गझल फक्त सौंदर्यावर लिहिली पाहिजे.


काही रुढीवादी गझलकरांचा असा गैरसमज आहे की गझल फक्त प्रेम, सौंदर्य आणि अशा विषयांवरच लिहिली पाहिजे. गझलची सर्जनशीलता केवळ प्रेम किंवा सौंदर्यापुरती मर्यादित नसून ती व्यापक आहे. गझल म्हटलं की अनेकांना त्यात प्रेयसी विषयी वाटणारे प्रेम, सौंदर्याची तारीफ, विरह, दु:ख, आदी भावनाच व्यक्त होतात असं वाटतं. गझल ही फक्त प्रणयधुंद किंवा भावनाशील अभिव्यक्तीपुरती मर्यादित नाही. तर गझल ही कोणत्याही विषयावर लिहिली जाऊ शकते. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच वैयक्तिक जीवनातील समस्यांवरही गझल लिहिता येते. वास्तविक, मराठी गझल स्वतःला अशा कोणत्याही बंधनात अडकवून मर्यादित करीत नाही.  गझलमध्ये कोणत्याही भावनांचा अंतर्भाव होऊ शकतो. जीवनातील विविध अनुभव, विचार, आणि समस्या गझलेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्या जाऊ शकतात. ती जीवनातील कोणत्याही विषयावर भाष्य करू शकते. तिला वैविध्यपूर्ण विषय हाताळता येतात, मग ते समाजातील समस्या असोत किंवा राजकीय, सामाजिक विचार असोत.


गैरसमज ७ : 'दीवान' मधली गझल हीच उत्तम गझल.


'दीवान ' म्हणजे गझलकाराने लिहिलेल्या गझलांची विशिष्ट अनुक्रमाने मांडणी केलेला गझलांचा संग्रह. रदीफच्या शब्दांतील शेवटचे अक्षर विचारात घेऊन अकारविल्हे ( Alphabetically) पद्धतीने हा अनुक्रम निश्चित केला जातो. रदीफ नसलेल्या गैरमुरद्दफ गझलांच्या काफियातील शेवटचे अक्षर विचारात घेतले जाते. 

'दीवान'मधली गझलच उत्तम असते आणि इतर गझला त्या मानाने कमी दर्जाच्या असतात. असाही एक गैरसमज आहे. गझलेच्या 'दीवान'मधील गझला उत्तम, सामान्य वा निकृष्ट यापैकी कोणत्याही दर्जाच्या असू शकतात. कारण त्यांचा दर्जा गझलकाराच्या प्रतिभेवर ठरतो. गझलेची गुणवत्ता तिच्या बांधणीतून, मतल्याच्या स्वरूपातून, रदीफ-काफियातून आणि मोजक्या शब्दांत अनुभवजन्य आशय मांडण्याच्या शैलीतून ठरते. त्यामुळे गझल तिच्या स्व-रूपाने गुणवान ठरते, ती एखाद्या संग्रहात अनुक्रमाने कुठल्याही पृष्ठावर असू शकते. सध्याच्या काळात अनेक कवी गझलचे नव्याने प्रयोग करत आहेत, विविध विषयांवर गझल लिहिली जात आहे. त्यामुळे 'दीवान'मधील गझलच उत्तम असे ठाम विधान करणे गझलच्या सर्वसमावेशक आणि विकसित स्वरूपाला कमी लेखणे ठरेल.


गैरसमज ८: गझलेत काफियांची पुनरावृत्ती करू नये.


गझल हा अत्यंत बांधेसूद काव्यप्रकार आहे, ज्यात काफिया आणि रदीफ यांचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गझलेत काफियांची पुनरावृत्ती करू नये हा देखील असाच एक गैरसमज. खरं पाहता, गझलमध्ये काफियांची पुनरावृत्ती केली जाऊ शकते, आणि योग्य ठिकाणी तिचा वापर केल्यास ती गझलची लयबद्धता आणि सौंदर्य वाढवते. काफियामुळे गझलेमध्ये लय निर्माण होते. काफियांची पुनरावृत्ती वेगळ्या खयालाने गझलेच्या सौंदर्यात भर घालू शकते. काफिया हा शब्दसौंदर्य आणि कल्पकतेचे प्रतीक असतो. तो ज्या खुबीने उपयोजित केला जातो त्यामुळे त्या शेराची लज्जत वाढते. जर कवीने एकाच काफियाची पुनरावृत्ती आशयाच्या नावीन्यपूर्ण आयामाने केली, तर गझलेतील सौंदर्य अधिक खुलते. हेही मान्य केले पाहिजे. गझलेत काफिया आणि रदीफ यांचा समन्वय महत्त्वाचा असतो, काफियाची पुनरावृत्ती केल्याने गझलचा प्रभाव कमी होत नाही. हेही तेवढेच खरे. याचा अर्थ काफियांची पुनरावृत्ती सर्रासपणे करावी असा कुणी घेऊ नये.  मतल्यात निवडलेल्या काफियाचे शब्द आपल्या प्रचलित भाषेत कमी असतील तर एकाच अर्थाने, किंवा वेगळ्या अर्थाने काफियाची पुनरावृत्ती संभवते. मराठीत फारशी नसली तरी उर्दू -हिन्दीत काफियांच्या पुनरावृत्तीची अनेक उदाहरणे सापडतात.


गैरसमज ९: गझल बेमतला असू शकत नाही.


गझलच्या रचनेत दोन प्रमुख घटक असतात - मतला आणि शेर. मतला हा गझलेचा पहिला शेर असतो. यामध्ये वापरलेले वृत्त, रदीफ आणि काफिया हा पूर्ण गझलेत वापरला जातो. म्हणूनच यास गझलेची जमीनही म्हणतात. मतल्यात उला मिसरा आणि सानी मिसरा दोन्हींमध्ये रदीफ आणि काफिया असतात. तर शेर हा दोन ओळींचा, ज्यातील फक्त सानी मिसऱ्यात रदीफ व काफिया असतो. हा झाला गझलचा ठरीव आकृतिबंध,परंतु प्रत्यक्षात एखादा खयाल कागदावर उतरवताना तो मतल्याच्या रूपातच सुचतो असे नाही.तर तो बरेचदा स्वतंत्र शेराच्या रूपात शब्दबद्ध होतो. प्रथमदर्शनी आपण असे मानले की प्रत्येक शेर एक स्वतंत्र विचार किंवा भावना व्यक्त करतो आणि प्रत्येक शेराचे स्वतंत्र अस्तित्व असते, तर मतला किंवा बेमतला या गोष्टीला फारसे महत्त्व उरत नाही.जर एकच जमीन असलेले मुकम्मल अनेक शेर असतील आणि त्या रचनेत मतला नसेल तर तिला गझलच म्हटले जाते. अशा बेमतला गझलांची उदाहरणे अत्यल्प आढळतात.

एकूणच गेल्या काही दशकांत गझलच्या स्वरूपात बरेच बदल झाले आहेत हे स्वीकारावे लागतील. आधी गझल ही पारंपरिक चौकटीत बसणारी होती. पण आज गझलचा स्वर अधिक विस्तारला आहे. आधुनिक काळात गझलकार प्रेम, प्रणय, विरह यापुढे जाऊन विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आणि मानवी भावनांवर आधारित गझल लेखन करीत आहेत. त्यामुळे गझल हा साहित्यप्रकार सर्वश्रुत आणि व्यापक अनुभूती देणारा झाला आहे. यामुळे गझलच्या नव्या रूपाची व्याप्ती वाढली आहे. आधुनिक गझलमध्ये समाविष्ट झालेले बदल-


- विषयांचा विविधांगी समृद्ध विचार.

- तांत्रिकतपेक्षा सर्जनशीलतेवर भर.

- अधिक सुलभ सोपी भाषा.

- अनुभूतीच्या वेगवेगळ्या पैलूंवर भाष्य.

- अनेकार्थ सूचनक्षमतेवर भर.

- आशयगर्भता, इत्यादी. 


गझल हा साहित्यप्रकार विविधता आणि सर्जनशीलतेचे मिश्रण आहे. तिच्या तांत्रिक बाजूंचा आदर करताना गझलकाराच्या सृजनशीलतेवर कुठलीही मर्यादा घालणे चुकीचे ठरते. गझलच्या लेखनात वृत्त, भाषा, विषय आणि शैली याबाबत गैरसमज न पसरवता गझलचे व्यापक स्वरूप समजून घेणे ही काळाची गरज आहे.

तर गझलकार मित्रांनो 'लकीर के फकीर ' न होता गझलविचाराच्या बाबतीत स्वीकारशील रहा.अधिक विकसनशील व्हा.समृद्ध व्हा.

तुमच्या गझललेखनाला

मनःपूर्वक शुभेच्छा !

- संपादक

....................................................

104 comments:

  1. खूप सुंदर,मार्गदर्शक लेख. अनेक गैरसमज दूर झाले. खूप खूप धन्यवाद, आभार.

    ReplyDelete
    Replies
    1. सप्रेम स्वागत

      Delete
    2. सप्रेम धन्यवाद

      Delete
    3. गैरसमज दूर करणारा हा खूपच अभ्यासपूर्ण लेख वाचून मनातले पुष्कळ संभ्रम दूर झाले. सर्वसाधारणपणे एखादा गझलकार/रा जेव्हा नव्याने लिहू लागतो/ते , तेव्हा खूप प्रश्न असतात,कारण कुठल्याही दोन एक्स्पर्ट च्या मतांमध्ये एकवाक्यता नसते. मग खूप गोंधळ उडतो. पण आज बहुतेक पाॅइंट्स स्पष्ट झाले आहेत. खरं तर आपण कधी चांगली गझल लिहू शकू....हेच आधी स्वप्न वाटायचं. पण याचं श्रेय सर्व गझलगुरूंना जाते.....आणि ते एवढे अपार कष्ट घेऊन पब्लिश करणा-यांना पण जातेच जाते.
      श्रीकृष्ण सरांच्या आम्ही आजन्म ऋणात राहू.सरस्वतीची कृपा आमच्यावर व त्यांच्यावर सदैव असावी!🙏

      Delete
  2. खूप सुंदर लेख आहे सर!

    ReplyDelete
  3. खूप सुंदर, सविस्तर संपादकीय! मनातले अनेक गैरसमज दूर झाले !

    ReplyDelete
  4. खूप खूप छान लेख आहे सर 🙏

    ReplyDelete
  5. खूप सुंदर मार्गदर्शन...

    ReplyDelete
  6. हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !

    "सिमोल्लंघन " ने अनेक नवीन नवीन गझलकार प्रकाशात आणले आहेत!

    ReplyDelete
  7. सुंदर लेख ,अनेक समज गैरसमज दूर करणारा👌👌💐💐❤️❤️🙏🙏

    ReplyDelete
  8. पारंपारिक ,आणि हल्लीच्या गझला , एकंदर गझलेची व्याप्ती,विषय , गझलकारांची सर्जनशीलता शिवाय त्यासंबंधीचे गैरसमज अतिशय व्यापक तेने या लेखात उद्धृत केले आहेत ... वेळोवेळी राऊत सर आपण आम्हाला याबाबत मार्गदर्शन केलेलेच आहे .. खूप खूप आभार

    ReplyDelete
  9. खूप सुरेख मार्गदर्शनात्मक संपादकीय लेख आहे सरजी. तुम्ही करीत असलेल्या कार्याला सलाम.
    डॉ. सुभाष हरिबा कटकदौंड, खोपोली - रायगड

    ReplyDelete
  10. नमस्कार! गझल लिखाणात अगदीच नवखा असताना एवढी महत्वपूर्ण माहिती आणि दिग्गजांच्या गझला एकाच ठिकाणी वाचायला मिळणे म्हणजे गझल शिकण्याची सुवर्णसंधीच! सर्व सहभागी गझलकारांचे मनःपूर्वक अभिनंदन...
    संपादकीय लेख वाचून, बहुतेक सर्वच गैरसमज दूर झालेत.
    आपल्या संपादकीय मंडळातील सर्वच सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीला सलाम! ज्येष्ठ गझलकार श्रीयुत डॉ श्रीकृष्ण राऊत सर, डॉ विनोद देवरकर सर आणि संपादकीय मंडळातील इतर मान्यवर सदस्यांचेही ही संधी सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!

    ReplyDelete
  11. विस्तृत छान लेख, संग्रही ठेवावा असा..

    ReplyDelete
  12. अनेक गैरसमज दूर होतील या लेखामुळे....छान मार्गदर्शन केलत

    ReplyDelete
  13. संग्रही ठेवावा असा लेख

    ReplyDelete
  14. खूप छान व विस्तृत माहिती मिळाली 🙏

    ReplyDelete
  15. खूप खूप धन्यवाद सर! अतिशय व्यवस्थित, मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलंत आपण. मी स्वतः ह्या प्रांतात नव्यानेच आलेली असल्याने हे सर्व समज, गैरसमज वगैरे वगैरेंनी मलाही चांगलेच थकवले होते. त्यामुळेच तुमच्या ह्या लेखाने खरोखरच खूप दिलासा तर मिळालाच शिवाय उत्साह द्विगुणित झाला. आपण आणि आपली टीम गझलेच्या प्रसार आणि प्रचारासाठी ज्या तळमळीने, ज्या पोटतिडकीने, हे अथक परिश्रम करताहेत त्यासाठी आपणास मनःपूर्वक धन्यवाद! 🙏

    ReplyDelete
  16. उपयुक्त व सुरेख अभ्यासपूर्ण माहिती

    ReplyDelete
  17. सखोल मार्गदर्शन आणि शंका निरसन करणारे संपादकीय आहे.

    ReplyDelete
  18. गझलकार,सिमोल्लघन गझल विशेषांक एक स्तुत्य उपक्रम सर.आपले व सर्व संपादकीय टीमचे मनस्वी धन्यवाद.गत १६ वर्षापासूनचा हा उपक्रम आपण राबवित आहात.अभिनंदन यासाठी .संपादकीय लेख मझ्या मनातील.नव गझल लेखकांच्या मनातील सर्व गैरसमज दूर केलेत.या मुळे गझल लेखनाच्या कक्षा निश्चितच रुंदावल्या आहेत. अलीकडच्या गझलेने सीमा रुंदवल्या आणि सर्वसामान्याची झाली. गझलचा महावृक्ष होत आहे. यात आपले मोलाचे योगदान आहे. मोजकेपणाला छेद दिला. आज सर्वसामान्य रसीक,वाचक,लेखक गझलेच्या जवळ येत असल्याचा आनंद होत आहे. बोलीभाषेतील शब्द,हिंदी,इंग्रजी शब्द येवू लागले आहे. आपण आपले परखड निरीक्षण नोंदविले सर.धन्यवाद!

    ReplyDelete
  19. गझलचा अभ्यास करत असतांना व नंतर गझल लेखन करतांना माझ्या मनातही हे सगळे प्रश्न वारंवार येत असत आणि आजही येतातच. कुठे तरी, काही तरी वाचलं जातं, काही तरी ऐकलं जातं व महत्वाचे म्हणजे कुणी तरी काहीतरी नवीन सांगतात, तंत्र-मंत्र, आराखडा यात बसत नसल्याचे सांगून नव्यानेच गझल लिहिणाराच्या मनात गोंधळ निर्माण करण्याचे प्रकारही पाहण्यात, ऐकण्यात आले आहेत.
    गझल शिकणा-याच्या मनात येणा-या जवळपास सर्वच प्रश्नांची अभ्यासपूर्ण अशी उत्तरे जेष्ठ गझलकार डॉ श्रीकृष्ण राऊत सर यांनी मुद्देसूदपणे, सांगोपांग चर्चा करुन, त्यावर सविस्तर विवेचन देऊन गझल संबंधीचे गैरसमज दूर करण्याचे एक मोठे कार्य या संपादकीय लेखातून केले आहे असे मला वाटते. हा लेख नव्यांबरोबरच जुन्या गझलकार मित्रांनाही उपयुक्त ठरेल असा मला विश्वास वाटतो. इतक्या सुंदर मार्गदर्शनासाठी श्री राऊत सरांचे मनापासून आभार ....!

    ReplyDelete
  20. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. अतिशय सुंदर.. मार्गदर्शनपर असा लेख यातून गजले विषयीच्या कितीतरी समस्याचे निराकरण झाले अशा मार्गदर्शनपर माहिती पूर्ण मार्गदर्शनासाठी श्रीकृष्ण राऊत सर आणि संपूर्ण संपादकीय टीमचे मनस्वी आभार

      Delete
  21. ज्ञानवर्धक लेख. तांत्रिकतेवर भर न देता, सृजनशीलता खरेच महत्त्वाची आहे. अक्षरगणवृत्तातील अक्षरे जुळवता जुळवता आशय निसटून जातो आणि गझलेचा केवळ निर्जीव सापळा उरतो. असे फोल शब्द रचून झालेली गझल स्वतः गझलकारालाही वाचाविशी वाटते का? सर, ही बाब आपण लेखात स्पष्ट केली, छान वाटले. आपल्या लेखाने अनेक गैरसमज दूर झाले. धन्यवाद.

    ReplyDelete
  22. सप्रेम धन्यवाद

    ReplyDelete
  23. बदल ही काळाची गरज आहे. बदल हे वैश्विक सत्य आहे. कोणतेही साहित्य हे निर्मिक आणि रसिक या दोघांच्या सृजनाचा बंध बांधणारे असते. गझललेखननही त्यास अपवाद नाही. शेरांमधून मांडलेले विचार, विषय हे वाचक, श्रोते यांच्या दाद प्रतिक्रियेमुळे कवीला प्रोत्साहन देणारे किंवा आत्मपरीक्षण करायला लावणारे ठरते. आपण मांडलेले विचार इतरांपर्यंत पोहोचतात का याचा हे लक्षात येते. तोचतोचपणा टाळून नवीन प्रयोग करणाऱ्या सर्व कवी गझलकारांना हे संपादकीय मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

    ReplyDelete
  24. सर, गझल विषयी शंका दूर होण्यासाठी संपादकीय दिशादर्शक

    ReplyDelete
  25. खूप सुंदर मार्गदर्शन, सर !
    💐💐💐

    ReplyDelete
  26. अतिशय सुंदर, प्रत्येकानं आपल्या संग्रही ठेवावा असा लेख.... खूप सोप्या भाषेत, सहजपणे समजतील अशा शैलीत गझलेसंदर्भातील गैरसमज समजून सांगितले आहेत... खूप खूप आभार सरजी 🌹😊🙏

    ReplyDelete
  27. ज़ व झ
    या बाबतीतही वेगवेगळे मतप्रवाह आहेत, त्यासंबंधी सुद्धा मार्गदर्शन करावे सरजी 😊🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मला व्यक्तिशः 'झ' योग्य वाटतो. गझल.

      Delete
  28. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  29. वाह खूप उपयुक्त असा लेख ... आमच्या सारख्या नवशिख्या विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न , संभ्रम या लेखामुळे दूर झालेत . खूप छान लेख👌👌

    ReplyDelete
  30. आदरणीय सरजी,
    हे संपादकीय म्हणजे गझल लिहणाऱ्यांसाठी एक आश्वासक मार्गदर्शीकाच आहे.
    गझल लेखन करतांना येणाऱ्या प्रातिनिधिक शंकांचे यात शास्त्रशुद्ध निरसन केलं आहे. जे काल सुसंगत आहे. यामुळे गझल लेखनाची कवडे किलकिलीच नाही तर सताड उघडी होतील. अर्थात, लिहणाऱ्यांनी गझलेची लय, आशयसंपन्नता आणि गांभिर्य गमावू नये याचा अनुभवी सल्लाही यातून आपसूक मिळतो.

    🌷🌷👍😊👍🌷🌷
    प्रा.बी.एन.चौधरी, धरणगाव.

    ReplyDelete
  31. गझलेची मराठी भाषेतील वाढत जाणारी लोकप्रियता, तिच्या आशय व विषयाची व्यापकता वाढवण्यासाठी केले गेलेले बदल..विशेषत: स्वर काफिया बद्दलचे..तसेच अक्षरगणवृत्त व मात्रावृत्त यांच्या उपयोगासंबंधीचे गैरसमज दूर करणारा हा मार्गदर्शन प्रद संपादकीय लेख खूप आवडला.

    ReplyDelete
  32. आपला लेख वाचून अनेक शंकाचे निरसन झाले..धन्यवाद सर..

    ReplyDelete
  33. खूप छान मार्गदर्शन सर. अत्यंत उपयोगी माहिती दिली आहे. टिमचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏💐

    ReplyDelete
  34. अतिशय समर्पक व समर्थ संपादकीय. आपल्यासारख्या अधिकारी गझलगोकडून मिळालेले हे मार्गदर्शन नवोदितांपासून प्रथितयश गझलकारांपर्यंत अनेकांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल.

    ReplyDelete
  35. अतिशय सुंदर मार्गदर्शक लेख...🙏🌹

    ReplyDelete
  36. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  37. सुंदर, अभ्यासपूर्ण लेख.
    नवोदितांना मार्गदर्शक

    ReplyDelete
  38. अभ्यासपूर्ण लेख, गझल लेखन करताना प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेला संभ्रम.... लेख वाचनाने नक्कीच दूर होईल. नव्याने गझल लिहू पाहणा-यांना या सर्व संभ्रमामुळे इच्छा असूनही धाडस होत नाही किंवा त्यांच्या मनात न्युनगंड तयार होतो की मला शक्य नाही. आपल्या सारख्या जेष्ठांकडून योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळणे खूप आवश्यक असते. आपल्या संपादकीय लेख खूप महत्वपूर्ण आहे.

    ReplyDelete
  39. सविस्तर मार्गदर्शन लाभले.अनेक संभ्रम दूर झालेत... खूप .कृपया या संदर्भात मार्गदर्शन करावे 🙏 खूप धन्यवाद सर 🙏
    वृत्तासमोर वृत्ती लाचार होत आहे...
    झुंजार लेखणीचा अडवून स्त्रोत आहे...
    या माझ्या संभ्रमातून सुचलेल्या शेतावरील उत्तर आपल्या संपादकीय लेखांमधून मिळाले..🙏
    परंतु स्वर काफीया संदर्भात अकारांती स्वर काफीया वापरूनये असे म्हटले जाते

    ReplyDelete
    Replies
    1. आभार. अकारान्त स्वर काफिया उर्दू गझलांत आढळत नाही. मराठीत एक्कट दुक्कट गझला आहेत. थोडक्यात अकारान्त स्वर काफिया घेतल्या जात नाही.

      Delete
  40. खूपच छान मार्गदर्शन मिळाले. गजल लेखनाविषयी बरेच गैरसमज दूर झाले. आदरणीय राऊत सरांचे खूप खूप आभार...

    ReplyDelete
  41. महत्वपूर्ण लेख,,, बरेच गैरसमज दूर झालेत
    बऱ्याच शंकांचे निरसन झाले
    खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏

    ReplyDelete
  42. गझलसंबंधी अतिशय सुंदर आणि मोलाचे मार्गदर्शन 👌👌
    अनेक मुद्द्यांवर सखोल स्पष्टीकरण गझल लेखनासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.

    ReplyDelete
  43. गझलसम्राट सुरेश भट साहेबांच्या 'गझलच्या बाराखडी'नंतर मराठी गझलच्या संदर्भात आजकाल गझलकारांमध्ये मतभिन्नता आढळते आहे. मराठी गझलचा उचित विकास होण्याच्या दृष्टीने आदरणीय डॉ. राऊत सर यांचे 'गझलकार'चे संपादकीय निश्चितच मार्गदर्शक आहे, यात शंका नाही. सांप्रतच्या काळातील मराठी गझल लेखनाबाबतचे‌ गैरसमज दूर होण्यास त्यामुळे नक्कीच मदत होत आहे. मार्गदर्शक संपादकीयासाठी आ.राऊत सरांना अनंत धन्यवाद.

    ReplyDelete
  44. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  45. गझल लेखनात नवोदित असताना आदरणीय श्रीकृष्ण राऊत सरांनी माझ्या गझलांना या अंकात संधी दिली यासाठी मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

    ReplyDelete
  46. खूप छान माहिती सर हे गैरसमज खूप रूजलेलेले आहेत त्यावर तुम्ही खूप सुंदर प्रकाश टाकला

    ReplyDelete
  47. खूप महत्त्वाची इतंभुत माहिती आपण दिलीत.
    समज गैरसमज यातील अंतर कळले .ज्ञानात भर पडली.
    बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. समाधान वाटले.

    ReplyDelete