तीन गझला:मनोज सोनोने

 



१.


कुठे सांग गेला? गड्या, पावसा तू

जरा बोल, खोटारड्या पावसा तू


तुझ्या भरवशावर असे जिंदगी ही

पुन्हा लाव ना रे, झड्या पावसा तू


कधी मागतो काय दुसरे तुला मी?

जरा दान दे मज नड्या पावसा तू


विजेसम कडाडू नको व्यर्थ नुसता ;

जरा बरसना बडबड्या पावसा तू.


उगी लेकरासारखा हट्ट धरतो

कसा जाहला रे अड्या पावसा तू


कुठे हात बांधून बसलास राजा

जरा मोकळ्या कर घड्या पावसा तू


तिला बोलवाया, मिठी घट्ट देण्या

तिच्या जा घराला सड्या पावसा तू


इथे बेडकासारखा ये कुदत तू

पुन्हा हो जरा तडतड्या पावसा तू


२.


आसवांची उचल घेतो

वेदने मी सवड घेतो


भुंकतो तर भुंक कुत्र्या

मी कुठे रे दखल घेतो


पाय ओढत बस हलकटा

बघ कशी मी मजल घेतो


घास उलटा घेत नाही 

नेहमी मी सरळ घेतो


याद करतो तो प्रियेला

बायकोला जवळ घेतो


३.


लागेल कशी नाव तिरावर

पाणी चढले जर डोक्यावर


चिंता खाते ही दिवसाला रात्र येते जणू अंगावर


चावतो निराशेचा कुत्रा

जगू लागलो की वाऱ्यावर


चकवा देते संधी मजला

वेळोवेळी मी दिसल्यावर


सांग जगू मी कोणासाठी ?

घर उठले माझ्याच जिवावर !


वाढले अपेक्षांचे ओझे

एकेक दिवस हा सरल्यावर


स्वप्न पाहतो प्रीतफुलांचे 

हृदयाला काटे रुतल्यावर


हुंदका कशाने रोखू मी ?

डोळ्यांना अश्रू आल्यावर

..................................................

No comments:

Post a Comment